लातूर: लातुरला शैक्षणिक हब, उद्योग नगरी तसेच स्वच्छ
सुंदर करण्यासाठी खूप काम करण्याची आवश्यकता आहे. आपली माझ्याकडून तशी अपेक्षाही आहे. एकमेकांच्या साथीने आपण सर्वजण प्रयत्न करून भविष्यातील लातूर घडवू, असा विश्वास भाजपा महायुतीच्या लातूर मतदार संघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिला. शहरातील सीए, व्यापारी व बिल्डर्स असोसिएशनच्या कलेले विष्णूजी की रसोई गार्डन येथे आयोजित संवादात डॉ. चाकूरकर बोलत होत्या. यावेळी सुबोध बेळंबे, किरण मंत्री, रुशिकाताई पाटील चाकूरकर, राहुल धरणे, जगदीश कुलकर्णी, सीए आनंद बारपुते, सुशील बेळंबे, श्रीकांत बेळंबे यांच्यासह शैलेश
गोजमगुंडे, संतोष हत्ते, कुशाग्रसिंह आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सीए, व्यापारी व बांधकाम व्यावसायिक यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना एअर कनेक्तिव्हिटी असायला हवी. आयटी हब असल्यामुळे बेंगलोर आणि दिल्लीची कनेक्टिव्हिटी असावी. लातूरची आयटी हब म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. आतापर्यंत आम्ही जाहीरनामे पाहून मतदान केले. आता आपले काम पहायचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती. हाच धागा पकडत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी उपस्थितांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करत भविष्यातील नियोजनाबाबत त्यांना आश्वस्त केले. लातूरमधील व्यापारी व व्यावसायिक अजूनही उघडपणे बोलत नाहीत. आपण मला बोलावून हा कार्यक्रम आयोजित केला, आपल्या भावना मांडल्या त्याबद्दल आपले कौतुकच करायला हवे. कुठलाही प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे असते. आतापर्यंत आपण जाहीरनामे पाहूनच मतदान केले. माझ्याकडून मात्र अपेक्षा व्यक्त करत आहात. पण आव्हाने स्वीकारणे हा माझा स्वभावच आहे. कमी बोलून अधिक काम करणे ही माझी सव्य आहे. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न वापरता एकमेकांच्या साथीने मी लातूरसाठी काम करत राहणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाल्या.
0 Comments